शेतकऱ्यांना जुन्याच दराने खते.
गेल्या काही दिवसात रासायनिक खतांच्या किमती वाढल्या होत्या. यावरून मोठा विरोध पाहायला मिळत होता. आता विरोधानंतर केंद्र सरकारने जुन्याच दरात खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने खतांवरील अनुदानात वाढ केल्याने आता खत जुन्याच किंमतीत मिळतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताचे एक पोते 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट खतांवरील अनुदानात 140% वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना डीएपीची पिशवी 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. या अनुदानापोटी सरकार 14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.